Sunday, September 7, 2014

'भारतीय क्रीडा सेवेची सुरुवात व्हायला हवी'

बिशन सिंग बेदी यांचे प्रतिपादन 
एसजेएएन-रायसोनी वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरीत 

‘भारतीय क्रीडा क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी नवे धोरण आखण्याची गरज आहे. वगाने बदलणारी परिस्थिती पाहता क्रीडा क्षेत्राचा कारभार सुरळीत चालावा म्हणून भारतीय क्रीडा सेवा (इंडियन स्पोर्टस् सर्व्हिसेस) ही नवी प्रशासकीय रचना तयार करण्यात यावी,’ अशी कल्पना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी रविवारी मांडली. 
स्पोर्टस् जर्नालिस्ट्स् असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) आणि रायसोनी समुहाच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमूख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर समूहाचे अध्यक्ष सुनिल रायसोनी, एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम  ठाकुर आणि सचिव कीशोर बागडे उपस्थित होते. 
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी बेदी यांच्या हस्ते हिंगणा ये‌थील नेहरु विद्यालय (सेंटर पॉइंट स्कूल ट्रॉफी), कामठीचे एस. के. पोरवाल कॉलेज (के. सी. बजाज मेमोरियल ट्रॉफी), क्रीडा संघटक मनिष गौर (मीरादेवी दस्तुरे ट्रॉफी), बास्केटबॉलपटू मुग्‍धा अमरावतकर (बैद्यनाथ ट्रॉफी), बॅडमिंटनपटू रोहन गुरबानी (जी. एच. रायसोनी ट्रॉफी), ज्योती चव्हाण (जी. एच. रायसोनी ट्राफी) आणि फैज फजल (जी.एच. रायसोनी ट्रॉफी) यांचा सत्कार करण्यात आला.   
भारतीय क्रीडा सेवेची संकल्पना अधिक विस्तृतपणे मांडताना ते म्हणाले, ‘राज्यव्यवस्‍थेचा भाग म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अशा विविध रचना करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर भारतातील क्रीडा क्षेत्रासाठीही विशिष्‍ट प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तसे झाले तर, क्रीडा संघटनांमध्ये वर्षानुवर्ष खुर्च्या अडवून बसलेल्यांवर आपोआपच बंधने निर्माण होतील आणि भारतीय क्रीडा क्षेत्र अधिक जोमाने कार्यरत होईल.’
‘या जगात कायमचे काहीच नसते. जे वर गेले ते खाली येणारच, हा प्रकृतीचा नियम आहे. फक्त वर गेल्यानंतर (यश मिळाल्यानंतर) खाली येण्यासाठीचा कालावधी जो लांबवू शकतो तोच महान खेळाडू ठरतो,’ असा मंत्र भाररताच्या सुप्रसिद्ध फिरकी चौकडीचा भाग असलेल्या बेदी यांनी यावेळी दिला. 
नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करताना बेदी यांनी टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून प‌ाहिले पाहिजे, असा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘वर्तमानपत्रातून किंवा इतरांकडून होणाऱ्या टिकेसाठी खेळाडूंनी नेहमीच तयार असले पाहिजे. टिकेमुळे आपले काय चुकले आहे ते कळते आणि त्यातून नवीन काही तरी शिकायची संधी मिळते. ‌आपले मित्र काय चुकलं ते कधीच सांगणार नाहीत. ते आपल्या सगळ्याच गोष्टीची तारीफ करतील. टिकेमुळे आपण शहाणे होतो. त्यामुळे आपल्या खेळावर टिका करणाऱ्यांचा खेळाडूंनी राग करण्याचे कारण नाही.’
कार्यक्रमाचे संचालन सुहास नायसे यांनी तर प्रास्ताविक किशोर बागडे यांनी केले. 

----------------------------

स्वतःच्या परिस्थितीचा अभिमान असू द्या
स्वतःचा परिचय देताना खेळाडूला लाज वाटायला नको. उलट खेळाला प्रतिकूल परि‌स्थिती असेल तर त्याचा अभिमान असायला हवा, असा सल्ला बेदी यांनी खेळाडूंना दिला. आपली मूळं पक्की असली तर आपण अधिक मोठे होऊ शकतो, असे ते म्हणाले. नागपुरातील क्रीडा क्षेत्राला क‌िंवा एखाद्या खेळाडूला कुठलीही मदत हवी असेल आणि माझ्याकडून ती करणे शक्य असेल तर, त्यासाठी मी सदैव तयार आहे, असे आश्वासन बेदी यांनी दिले.

No comments: